1. आजकाल खोबरेल तेल रोज सकाळी एक चमचा प्यायला सांगतात, ते योग्य आहे का?
उत्तर- नारळ हा एक कल्पवृक्ष आहे. याच्या फळाचे वेगवेगळ्या रुपात वेगवेगळे फायदे होतात. एकूणच तहान लागली तर पाणी पिता येते, भूक लागली तर खोबरं खाता येते आणि थंडी वाजली तर शेकोटी करता येते असे सर्व ऋतूत सर्व काळात उपयोगी पडणारे नारळ म्हणूनतर सर्वश्रेष्ठ असे श्री फळ झाले. पूजेपासून सत्कारापर्यंत प्रत्येक गोष्टीत यास प्रथम मान मिळाला. नारळ रसाने मधुर, वीर्याने शीत, गुणाने गुरु व त्रिदोष शामक आहे. नारळाचे पाणी माणसाची तहान भागवते शिवाय उत्साह वाढविते, यात अनेक पोषण मूल्ये असतात. हॉस्पिटलमध्ये आजारपणात आवर्जून नारळ पाणी लोक रुग्णांना देत असतात. याने थकवा जातो, मांस पेशींना बळ मिळते. हृदयाला हितकर , वीर्यवर्धक, बल्य असे हे पाणी खूप गुणकारी असते. तसेच नारळाचे खोबरे सुद्धा. नारळाचे ओले खोबरे भूक भागविते, अस्थी धातूचे पोषण करते, हाडांना बळकटी देते. केसांची वाढ करते. रसायन कार्य करते, शुक्र धातूची वृद्धी करते. तर नारळाचे तेल सुद्धा हेच गुणधर्म अल्प प्रमाणात रोज सेवन केल्यास मिळतात म्हणून आजकाल लोक वर्जिन कोकोनट ऑइल म्हणून रोज याचे सेवन करतात किंवा भाजी करण्यात आहारात वापरतात. तेल मसाज डोक्याला व अंगाला केल्यास त्वचा मुलायम व चमकदार बनते शिवाय केश सुंदर काळे, मजबूत व लांब होतात. एकूणच पूर्वी स्त्रियांची ओटी भरायला वापरला जाणारा नारळ किंवा खोबऱ्याचा तुकडा हे स्त्री चे हक्काचे पोषण करणारे अन्न आहे, त्याचे सेवन तिने नियमित केले तर स्त्रियांना पाठदुखी, कंबर दुखी होत नाही. हाडे बळकट होतात व केस गळत नाहीत. थकवा जाणवत नाही.