1. आहारात मीठ अधिक सेवन केल्यास काय त्रास होतो? उत्तर- आहारात अतिरिक्त मीठ सेवन केल्यास पचनक्रिया , रक्त, मांस, मेद वैगेरे धातूंची हानी होते, मीठ अधिक प्रमाणात सेवन केल्यास आमाशयाचा दाह होतो, रक्तातील पित्त वाढू लागते, उष्णता वाढते. शरीरातील लवण रस मात्रा वाढल्याने त्वचारोग व शुक्रक्षय होऊ लागतो. जखमा लवकर भरून येत नाहीत, मूत्र रोग सुरू होतात. रक्तदाब वाढू लागतो, अंगावर सूज येऊ लागते. डोळ्याखाली सूज वाढू लागते, पायांच्या पंजावर पण सूज दिसू लागते. 2. मीठाला औषध म्हणून पण वापरता येते का? उत्तर- हो, मीठ हे प्रमाणात सेवन केल्यास उत्तम औषध आहे. जसे जास्त प्रमाणात घेतले की त्याने केस गळणे, केस पिकने, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे असे विकार होतात, तसेच मीठ प्रमाणात घेतले तर आहाराला चव आणणारे, शरीराला बळ देणारे, थकवा घालवणारे, शरीरातील अनावश्यक कफ कमी करणारे, रक्त, लघवी स्वच्छ करणारे, वेदना कमी करणारे, अन्न पचन प्रक्रियेत मदत करणारे व पोट फुगणे, पोट दुखणे , अजीर्ण, वायूशूल यात मदत करणारे, काम करते. तसेच मीठ अग्निवर्धक, रक्तप्रसादक, धातुवर्धक, दुर्गंधी नाशक, जंतुघ्न, कृमीघ्न कार्य करते. 3. मीठाचा बाह्य वापर कसा करतात? काय फायदा होतो.? उत्तर- मीठ हे उत्तम जंतुघ्न, कृमीघ्न व शूलहर आहे, त्यामुळे जखमा मिठाच्या पाण्याने धुतल्यास जंतुघ्न कार्य घडते, दातांच्या आत कृमी झाल्यास मीठाचा खडा दातात धरावा, कृमी मरतात, ठणका कमी होतो. त्याचप्रमाणे एखादा स्नायू दुखत असल्यास मिठाची पुरचुंडी तयार करून त्याने शेकावे म्हणजे वेदना कमी होतात. अंग दुखत असेल, अधिक काम करून थकवा आला असेल तरी कोमट मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास आराम मिळतो, थकवा जातो. त्याचप्रमाणे घसा दुखत असेल, कफ साठला असेल तर हळद मीठ पाण्याच्या गुळण्या केल्यास तात्काळ आराम मिळतो. छातीत कफ साठला असल्यास मिठाच्या पाण्याने उलटी केल्यास कफ कमी होतो किंवा तेल लावून छातीला मीठाने चोळावे कफ पातळ होऊन बाहेर पडतो, श्वास घ्यायला त्रास होत असल्यास आराम मिळतो. विंचू चावला असल्यास त्या जागी मिठाच्या पाण्याची धार धरल्यास विष लवकर उतरते, मिठाबरोबर मिरे वाटून खाल्ल्यास उलटी बंद होते तर विषमज्वर सारख्या तापाच्या प्रकारात मीठ व कोमट पाणी प्यायला दिल्यास ताप लवकर उतरतो, याच मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर कपाळावर ठेवल्यास ताप मेंदूत जात नाही व लवकर ताप उतरायला मदत होते.
Blog