1.आहारात पाण्याचे प्रमाण किती असावे? उत्तर- आहारात ज्याप्रमाणे एखादी सुगरण तांदूळ भिजत घालताना भात उत्तम शिजण्यासाठी जसे तांदळाच्या प्रकारानुसार, चूल, गॅस, भांडी या सर्वांचा विचार करून पाणी किती घालायचं हे ठरविते, त्याचप्रमाणे आपणही आपापल्या पाचन शक्तीचा विचार करून पाण्याचे प्रमाण ठरवावे. पाणी कमी झाल्यास जसा भात करपतो तसेच पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास अन्न घुसळण्याची प्रक्रिया जठरात उत्तम होत नाही व पचन बिघडते. तसेच भातात पाणी जास्त झाल्यावर जसा भात बिघडतो, गीजगा होतो तसेच आहारात पाणी जास्त झाल्यास अपाचित आहार रस अर्थात आम तयार होतो व आपल्याला आळस भरतो. म्हणून नेहमी पाणी आपापल्या पचन शक्ती चा अंदाज घेऊन प्रत्येकाने ते वेगवेगळे व गरजेनुसार प्यावे. आहारात पंच प्रासृत म्हणजे पाच वेळा आचमन करायला जेवढे लागेल तेवढेच पाणी प्राण, उदान, समान, व्यान, अपाण या पंच वायूंना स्मरून जेवणाच्या मध्ये मध्ये एक एक घोट घ्यावे म्हणजे जिभेवरील अन्नाचा थर जातो व पुढील घास अधिक रुचकर बनतो. नंतर जेवण पूर्ण झाल्यावर काही काळाने गरजेपुरतेच पाणी प्यावे. लक्षात ठेवा जेवणापूर्वी पाणी प्याल तर हटकुळे व्हाल, जेवणानंतर पाणी प्याल तर जाड व्हाल. म्हणून जेवणाच्या मध्ये मध्ये चार पाच घोट पाणी फक्त चवीपुरते व अन्न घुसळायला मदत होईल एवढेच प्यावे.
Blog