1. मला पोटाचा त्रास आहे , इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असे आजाराचं नाव आहे. तर आयुर्वेदात यावर काही उपचार आहेत का?
उत्तर- आयुर्वेदात या आजाराची लक्षणे साधारण ग्रहणी या आजाराशी मिळती जुळती आहेत. यामध्ये रुग्ण सतत पोटाचा विचार करत असतो. अन्न पचन न होणे, भूक नीट न लागणे, पोट पूर्ण साफ न होणे, सौचास जाऊन आलं तरी पुन्हा जावस वाटणे, ऑफिस ला जाताना, महत्वाच्या मीटिंग किंवा कामाला जाताना पूर्ण ड्रेस घातला असला तरी घरातून बाहेर पडताना एकदा परत सौचास जाऊन यावस वाटण आणि तसे करणे. पोट साफ न झाल्याने दिवस अस्वस्थ जाणं, कशातच लक्ष न लागणे, आपल्याला काहीतरी भलताच मोठा आजार झाला आहे वाटणे ही व अशी अनेक लक्षण या आजारात दिसतात. योग्य उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होतो. यात नियमित आहार, ध्यान धारणा, व्यायाम, पथ्य सोबतच आयुर्वेदात सांगितलेले शंख वटी, कुटज घन वटी , संशमनी वटी, आमपाचक वटी अशी अनेक औषधे वैद्याच्या सल्ल्याने घेतल्यास निश्चित आराम मिळतो. अश्या रुग्णांनी काही पथ्य पाळावीत. जसे की खाऊ की नको खाऊ वाटलं तर न खाणेच चांगलं. सौचास जाऊ की नको जाऊ वाटलं तर न जाणेच चांगलं. रात्री लवकर झोपावे, हलका आहार ठेवावा. खाणे पिणे झोपण्यापूर्वी किमान एक तास अगोदर संपलेले असलं पाहिजे. सकाळी काहीही घेऊन पोट साफ करण्याची सवय लावू नये. सतत पोटाचा विचार करू नये. कारण ही लोक 'डोकं पोटात आणि पोट डोक्यात' गेल्यासारखे वागतात. पोट सतत डोक्याचा तर डोकं सतत पोटाचा विचार करत असत. त्यामुळे यांनी ज्याला त्याला आपापले काम करू द्यावे. अनावश्यक चिंता व विचार करू नयेत. म्हणजे या आजारातून लवकर मुक्ती मिळते नाहीतर हा काही लवकर बरा होत नाही. आधुनिक शास्त्रात तर मेंदूवर जाणारी औषधे सुद्धा यात सुरु केली जातात.